Wednesday, March 3, 2010

ओस्साय...ओस्साय ते होलियो...

कटर घण.. कटर घण... घणचे कटर घण...कटर घण ! चा नाद..., हुर्रा रे हुर्रा आमच्या कालकाआईच्या डोक्यावर सोन्याचा तुर्रा.., अशी बोंबाबोंब! प्रतिपदेच्या चंद्राच्या प्रकाशात उजळून निघालेले मौजे मिरजोळे गाव! साथीला ......ची पुचाटली रे..होलियो, अशा घोषणा..! अवधूतचे रत्नागिरी आणि जोयनाच्या गोव्यात मला विलक्षण सारखेपणा जाणवला. त्यांचा शिमगा आपल्याकडे होळी..! आपल्या 'घाटी' लोकांमध्ये असतो तसा थिल्लरपण अजिबात नाही. खूप शिस्तबद्ध, सामुहिक भावना...ईश्वरी कार्य समजून केलेले समर्पण..साऱ्यांचा भावना देवाचा चरणी लीन होताना मी पहिल्या , अनुभवल्या . शिमग्याच्या त्या उत्सवात रात्रभर गावकार्यान्सोबत बोंबलत (हो बोंबलतच) फिरताना समूहात देव असतो असे सारखे वाटत होते, अजूनही वाटतेय.
रात्री १० वाजता हा कार्यक्रम सुरु होतो. पंचमीपासून उत्सवाला सुरुवात. रोज रात्री उशिरापर्यंत होळी जाळायची. मिरजोळे हे गाव १२ वाड्यांचे. एका वाडीत साधारण ५० ते ६० घरे. गुरुप्रसादचे घर एका वाडीवर. मागे पुढे नारळी - पोफळीची उंचच उंच झाडे. जिकडे पाहाल तिकडे हिरवळ, आणि लाल मातीत माखलेली वाट. अशा गावात शिमगा साजरा करायला गेलो होतो. सारे चाकरमाने मुंबईतून आपल्या गावी आलेले. कालिका , काल्कोबा व वाघजाई हि मिरजोळे गावाची दैवते. या ग्रामदेवतांची पूजा म्हणजे शिमगा ! शुद्ध पंचमीला देवीची रूपे लावतात. म्हणजे मुखवटे चढवून पालखीत बसवायचे. मुखवट्यांना हात लावण्याचा अधिकार फक्त गुरवांनाच. पूजेचा पहिला मान खोताचा. मग रोज देवीची पालखी नाचवायची. हे प्रचंड ताकदीचे काम. एकतर तुम्ही मस्तवाल (सांडासारखे) पेहलवान पाहिजे किंवा मग तर्र होण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमच्या सारखे बघे. पंचमी पासून पौर्णिमे पर्यंत देवी सहाणीवर असतात. (देवीचे शिग्म्यातील स्थान. म्हणजे या दिवसात देवी देवळात नसते; तर या सहाणीवर असते, अशी गावकर्यांची धारणा).
मग येतो होळी पुनवेचा दिवस. रात्री १२ वाजता सुरमाड आणण्यासाठी निघायचे. देवी कौल देईल तेच झाड तोडायचे. माझासमोर अंदाजे ५० ते ६० फूट माडाचे झाड जवळ जवळ २०० लोकांनी जमीनदोस्त केले. या कामात किती नारळी- पोफळी आणि आंब्याची झाडे कामी आली असतील ते 'देवच' जाणे. सारे managment गुरु झक मारतील, इतके चांगले नियोजन.
सुरमाडाची बांधाबांध झाली कि मग त्या झाडाला उचलून ठरवलेल्या ठिकाणी आणायचे. ढोल ताशांच्या आवाजात, मानkaryanchya सूचना , आणि अवघ्या गावाने भक्ती भावाने जोडलेले हात, अशा काहीश्या भारलेल्या वातावरणात रात्री १२ ते पाहते ५.३० पर्यंत हा माड योजलेल्या ठिकाणी पोहोचतो. हा उत्सव दृष्टीचा. केवळ डोळ्यात साठवून ठेवावा असा. मग होळी पेटवायची. काहींनी ती विझवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा.
मग देवीला गार्हाणी सांगायची. (म्हणजे नवस) . पहाटे साडेसहा वाजेपर्यंत हाच उद्योग. मग घरी जायचे. असा हा मी अनुभवलेला शिमगा.
पुस्तकातून वाचलेले आठवते. एक मुलगा त्याचा मुंबईच्या साहेबाला सांगत असतो, ' प्रतिपदेचे पिठूर चांदणे माझा कोकणातल्या घराच्या अंगणात उतरून यावे. आणि मी त्याला अलगद कडेवर उचलून घ्यावे. बस..! मला हेच सारखे आठवत होते.
देव नसल्याची अनुभूती कित्येकदा आली आहे. पण समूहात एक ईश्वरी अंश असतो याची जाणीव या निमित्ताने अधिकच गडद होत होती.
sesonable tourisim करणार्यांनी, कोकणातल्या, गोव्यातल्या एखाद्या गावात जावून हा अनुभव नक्की घ्या. कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे, याची अनुभूती पुस्तकातून कशी मिळणार?
(या उत्सवामुळे जाती पतीचे जवळून दर्शन झाले. बहुजनांचा हा उत्सव. पण आद्य पूजेचा मान सारस्वतांचा. पण कुठे बडेजाव नाही , कि जातीय अभिनिवेश नाही. ' जाती पातीच्या जुनाट भिंती , कुठेतरी थिट्या होतांना दिसल्यात.)
(' एक समस्या, एक विचार आणि एक कृती' हे मनाशी जुळलेले समीकरण काहीसे अपूर्ण होते. त्याच्या पुढचा भाग या शिमग्यात गवसला. सर्वांना एकाच वेळी गुंतवून ठेवेल असा कार्यक्रम! मग भलेही तो धार्मिक का असेना..! 'दाद्या'च्या भाषेत organised efforts )

Monday, January 18, 2010

तियात्र

माझ्या हातरुमालाइतके (कदाचित कमीच) कपडे अंगावर असलेल्या अनेक पर्यटक गोव्याचा कलंगुट, अंजुना, सिकेरी, वाघातूर बीचवर भारतीय संस्कृती पाहायला येतात; आणि भारतीय पर्यटक त्यांना. हे गोव्याचे पर्यटन! तुम्हाला गोवा अनुभवायचा असेल तर ग्रामीण भागात जा. ग्रामीण भागात गेल्यावर मी 'माझ्या गोव्याच्या भूमी' तला गोवा अनुभवला.
लाल मातीतले वळणाचे रस्ते. पहाटेचे धुके. नारळी- पोफळीचा बागा. आणि सांस्कृतिक वातावरण. आणि
तियात्र. तियात्र हा इथला आवडता कलाप्रकार. तीयात्रात कितीही संख्या असू शकते. लाइव म्युझिक हे तीयात्राची खासियत. माशासारखे सुंदर डोळे (इथल्या मुलींचे हे वैशिष्ट्य) असलेल्या नटया . त्यांचा समवेत पुरुषांचा कसदार अभिनय . तियात्र म्हणजे साडेतीन तासांचे ज्वलंत विषयावर भाष्य करणारे रोमन नाटक. अफलातून प्रकार आहे. तियात्र म्हणजे पोर्तुगीज भाषेत नाटक.
तीयात्रातील कांताराच्या ( कोंकणीत गीत) काही ओळी -
हि आयाजकालची भुरगी केन्ना शिकपाना, फकत चेडवा बराबर रावून करता पिशेपणा, फ्रेंड- फ्रेंड म्हणोन सगळ्यांच्या घालतात काना...... आनी मोगचो फोग जाऊन पडतात फोणा.
(माझे सहकारी शेखर नाईक हे स्वतः उत्तम कलाकार आहेत. त्यांचा कडून ऐकलेल्या या काही ओळी. एका दमात या ओळी म्हणायच्या हे विशेष. शेखरविषयी नंतर कधीतरी.)

Saturday, January 16, 2010

देव बरे करो म्हंता !

देव बरे करो म्हंता !
हि गोव्याची आभार प्रदर्शनाची पद्धत. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आभार मानायचे असल्यास तेंका देव भले करो म्हंता, असे म्हटले कि झाले. फुटकळ, फाटकळ , चोरलेल्या कविता न वापरता देव बरे करो म्हंता, असे म्हणायचे. आवडली बुवा आपल्याला हि पद्धत.

Wednesday, January 6, 2010

सुशेगाद !

अरोरा टोवेर्स ते सांतान इज (पणजिम) हा प्रवास तसा फार कंटाळवाणा नाही. सकाळी अमृततुल्यची सवय असल्याने सकाळी सकाळी बारच सुरु असतात; हेच तेवढे वेगळेपण. इथे रमलोय. भरीस भर म्हणजे आता महाराष्ट्रातून फोन आला कि काय 'गोवेकर कसे आहात?', असे विचारले कि बरे असा.'.तुम्ही खोयेन असा? असे उलट विचारले कि मग समोरचा गप्प होतो.
पिण्याचा पाण्यालासुधा इथे माशाचा वास येतो, त्यामुळे खाण्याबद्दल फार काही लिहित नाही.
गो मन तक - असे वर्णन एका मित्राने केले होते. तेच खरे आहे. परदेशी पर्यटक, 'मद्य'रात्री यापेक्षा गोवा खूपच वेगळा आहे. पोर्तुगीजांच्या पारतंत्राच्या खुणा जपत, भारतीय अस्मितेची लक्तरे अरबी समुद्राचा वेशीवर लटकलेली मला दिसलीत. त्यात मी 'भायला' ! कुठेही गेलो कि मीच आता मी 'घाटी' असल्याचा परिचय देतो; त्यामुळे पुढे प्रोब्लेम येत नाही. इथल्या भाषेवर, खाण्यावर, 'पिण्या'वर, संस्कृतीवर पोर्तुगिजांचा प्रभाव खूप आहे. एकाचवेळी कोंकणी, पोर्तुगीज शिकता येईल याचा आनंद आहेच. नवे मित्र मैत्रिणी भेटलेत.
वातावरणाशी जुळवून घेत, विरोधकांना टपली मारत हळू हळू काम शिकतोय. भात- तळलेला बांगडा, कढी, आमसुलाचे सार, पापड, लोणचे असे जेवण असल्याने पोटाची चिंता नाही.
इथे सकाळी दिवस लवकर सुरु होतो. साडेतीन वाजता इथे संध्याकाळ होते आणि आठ वाजता मध्यरात्र. बार तेवढे सुरु असतात. सकाळी उठून कोणती दारू घ्यायची आणि कोणता मासा खायचा; याच विचाराने दिवस सुरु होतो. (सध्या तरी माझा नाही.)
समुद्र मात्र धुंद करणारा. अफाट. आपली औकाद पहायची असेल न तर, समुद्रावर या. इथे कळते आपण किती शुद्र आहोत ते.!
मध्ये एकदा बा. भ. बोरकर यांचा गावी जाऊन आलो. मोठा माणूस होता. त्यांचा काळापासून सुरु असलेला कोंकणी मराठी वाद अजूनही सुरु आहे. परकीय आपल्यात भांडणे लावून जातात आणि आपण मुर्खासारखे भांडतो, याला गोवासुद्धा अपवाद नाही. तरीही ' आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा' हे सूत्र माझा मनाशी पक्के आहे. वातावरण, खाण्याला सरावलो आहे. माणसांचीही सवय होईल.
गोव्यात रुळण्यासाठी मला मदत करणारे गणाधीश प्रभुदेसाई (पुणे, लोकसत्ता) व जोयना (डीएनए, मुंबई) यांचे आभार!
सध्या तरी आयुष्य 'सुशेगाद'!!!!!!!!!!!